(६ वर्षांपूर्वी भरले कृषी पंपासाठी कोटेशन,अजून वीज जोडणी नाही,ऍट्रॉसिटी व दफ्तर दिरंगाई कायद्या नुसार कारवाई करावी ही प्रमुख मागणी,अधीक्षक अभियंता जाधव यांनी आंदोलकांना मोठ्या आवाजात बोलून दडपशाही करण्याचा केला प्रयत्न,आंदोलन चिघळण्याची शक्यता)
नांदेड| अनुसूचित जातीचे पीडित अर्जदार कॉ.प्रभाकर मोघाजी दर्शनवाड रा.मोहपुर ता.कीनवट जि.नांदेड यांनी सन २०१६ मध्ये दि.१४ डिसेंबर रोजी मोहपूर ता.किनवट येथील कृषी पंपासाठी रीतसर कोटेशन भरणा केलेले असून त्यांना अद्याप वीज जोडणी करून दिलेली नाही.
ते सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत. तसेच जातीने मातंग आहेत. त्यांच्या शेतातील वीज जोडणी करून,त्यांना झालेल्या मनस्तापाची व आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी तसेच ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व इतरांनी कॉ.दर्शनवाड यांची अडवणूक केली व त्रास दिला आहे. त्या सर्वांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार आणि दफ्तर दिरंगाई कायदा – २००५ नुसार कारवाई करावी म्हणून दि.१९ डिसेंबर पासून विद्युत भवन समोर कॉ.दर्शनवाड यांचे अमरण उपोषण आणि सीटू कामगार संघटनेच्या वतीने बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
पीडित शेतकऱ्याच्या शेतात सन २०१९ मध्ये महावितरण कंपनीने सिमेंट पोल देखील उभे केले आहेत.परंतु पीडित शेतकरी हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे तेव्हापासून आज पर्यंत कोणते ना कोणते कारण सांगून वीज जोडणी देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केला आहे. अर्जदार कॉ.दर्शनवाड यांनी अखंड सहा वर्षे पाठपुरावा केला असून त्यांनी संबंधित वरिष्ठासोबत नऊ वेळा पत्रव्यवहार केला आहे. माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहिती नुसार शेत सर्वे नं.२०८ क्षेत्र १ हेक्टर २५ आर मध्ये कृषी पंप विद्युत जोडणीचे कोटेशन रुपये पाच हजार दोनशे भरणा केले असून सन २०१६ च्या मंजूर यादीमध्ये २६१ अनुक्रमांवर त्यांचे नाव आहे.तेव्हाची २७५ जणांची मंजूर यादी त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
अल्पभूदारक शेतकरी तथा कामगार संघटनेचा पदाधिकारी उपोषणास बसला असून सिटूच्या वतीने या उपोषणास धरणे आंदोलन करीत पाठिंबा स्वरूपात बेमुदत धरणे सुरु आहे. पहिल्याच दिवशी मुख्य अभियंता श्री डोके आणि अधीक्षक अभियंता श्री जाधव यांच्याशी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची चर्चा झाली असून त्यानंतर श्री जाधव यांच्या कक्षात सिटूच्या शिष्ठमंडळासोबत प्रत्यक्षात चर्चा झाली आहे.आंदोलकाकडे सर्व पुरावे असताना अधीक्षक अभियंता श्री जाधव यांनी योग्य कारवाई करण्याची आणि सहानुभूती दाखविली नाही व मोघम स्वरूपात बोलणे पसंत केले.
तेव्हा कॉ.गायकवाड यांनी योग्य आणि कठोर कारवाई करावी व पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे बोलताच श्री जाधव हे मोठ्या आवाजात दमदाटी करीत बोलले त्या शिष्ठमंडळात सिटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड, तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड,असंघटितचे कार्याध्यक्ष कॉ.श्याम सरोदे,डिवायएफआयचे निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड, हॉकर्स युनियन चे अध्यक्ष कॉ.मारोती केंद्रे, मजदूर युनियन चे कॉ.नागनाथ पवार आदिजन उपस्थित होते.उपोषणार्थी हे अनुसूचित जातीचे आहेत हे माहिती असताना अधीक्षक अभियंता जाधव यांनी त्यांची दमदाटी करणे हे बेकायदेशीर आहे. वरिष्ठाकडे दाद मागणार असे कॉ.गायकवाड यांनी कळविले आहे.
मागण्या संदर्भात योग्य कारवाई केली नाही तर मुख्य अभियंता यांच्या कक्षात घेराव घालणार असा इशारा कॉ.उज्वला पडलवार यांनी दिला आहे. तातडीने कॉ.दर्शनवाड यांना न्याय दिला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दलितांना उपोषण करावे लागते म्हणजे खुपच वेदनादाई आहे असे मत सीटूच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार देखील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे.