हिमायतनगर, अनिल मादसवार। सर्व सामान्य लोकांच्या अडी अडचणी समजावून घेऊन त्या कश्या सोडविता येतात, यासाठी आपण ग्रामीण भागात फिरत आहोत. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर ही शेतकऱ्यांचे, बेरोजगाराचे, प्रश्न आजही कायमच आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी वंशज आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवाजी महाराजांनी सुराज्य चालवीले, परंतू आजची आपण पाहिलेली ग्रामीण भागातील परिस्थिती फार बिकट आहे. आम्ही या राज्यात चाललेली परिस्थती बदलली पाहीजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन गोरगरिबांना त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. माझे वंशज छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवलेले सुराज्य पुन्हा नव्याने आम्हाला आणावयाचे, या करिता आपण सर्वांनी स्वराज्य संघटनेला ताकद द्यावी. असे अवाहन युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
ते हिमायतनगर वाढोणा शहरातील परमेश्वर मंदिर प्रांगणात शनिवार दि. २४ सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजी राजे यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात छत्रपती संभाजी राजे बोलत होते. स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत राजे ता. २४ रोजी हिमायतनगर तालूक्याच्या दौर्यावर आले होते. तालुक्यातील कामारी, जवळगाव, वाघी, दिघी, घारापूर, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, शेल्लोडा, एकंबा, टेंभी, सरसम, करंजी, दुधड सह अनेक ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या फलकाचे फित कापून अनावरण राजेंनी केले. दरम्यान दुपारी सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील देवसरकर यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजी राजे यांच्या स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अनेकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
त्यानंतर त्यांनी येथील आराध्य दैवत श्री परमेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन सभेला सुरुवात केली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना झाली, यावेळी पुढे बोलतांना छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, इथल्या राजकारण्यांनी आपल्या राज्यात उद्योग व्यवसाय उभे केले नसल्याने युवकांना रोजगारासाठी शेजारील तेलंगणात जावे लागते. ही बाब फार दुर्दैवाची आहे. या भागातील किनवट तालूक्यात मौल्यवान वनसंपदा आहे. इकडे करण्यासारखे खुप काही आहे, परंतू येथील राजकारण्यांची उदासिनता या भागातील जनतेच्या मुळावर उठली आहे. येथील अभयारण्य वाढून यात सुधारणा केल्यास रोजगार निर्मिती होईल मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही.
सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगाराचे मूलभूत प्रश्न मांडले जात नाहीत, तर आरोप, प्रत्यारोपाचा गोंधळ सुरू आहे. ही बाब दुर्दैवाची आहे, राजकारण्यांनी अधिवेशनात विकासात्मक, उद्योग व रोजगार आणि जगाचा पोशिंदा बळीराजा ला पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घ्यावे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी काम केलेले स्व. नेताजी पालकर यांच्या स्मारकासाठी या भागातील राजकीय नेत्याची उदासीन भुमिका मनाला वेदना देणारी आहे. आपलाला नव्याने राज्यात सुराज्य आणावयाचे आहे. ही विदारक परिस्थिती बदलली पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण सर्वांनी स्वराज्य संघटनेला ताकद देवून सुराज्य निर्माण करण्यासाठी ताकदीने उभे राहीले पाहीजे. असे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगीतले.
प्रास्ताविक माधव देवसरकर यांनी केले. तर सूत्रसंचालन गोविंद शिंदे, राम सुर्यवंशी यांनी केले. यावेळी स्वराज्य संघटनेचे मराठवाड्यातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव देवसरकर, नवदिप वानखेडे, उत्तम मिराशे, अवधूत पवार, गोविंद शिंदे, राम सुर्यवंशी, बालाजी ढोणे, मुन्ना शिंदे, निलदिप पाटील, अमित पाटील, आदींसह अनेकांनी प्रयत्न केले.
सर्व नांदेडकरांचे आभार !! स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत जालना, रायगड, नाशिक, परभणी जिल्हा दौऱ्यानंतर नांदेडकरांनी दिलेला उस्फूर्त प्रतिसाद स्वराज्य वाढीसाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव व हिमायतनगर तालुक्यात स्वराज्य च्या ७० हून अधिक शाखांचे उद्घाटन झाले असून, उर्वरित तालुक्यात पुढील टप्प्यात शाखा तयार करण्यात येतील. असे सांगून संभाजी राजे यांनी मनापासून आभार मानलं.