नांदेड| दक्षिण भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी यात्रा म्हणून अनेक दशकांपासून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रा नियोजनातील त्रूटी आणि यात्रेकरूंच्या गैरसोयीचे भांडवल करत खा. चिखलीकर या गाेष्टींना प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत आहेत. यात्रेपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका स्वतः व खा. सुधाकर तुकाराम श्रृंगारे तसेच स्थानिक आ. शिंदे यांनी घेत प्रशासनामार्फत नियोजन करून घेतले. यामुळे यात्रा नियोजनातील त्रुटींना प्रशासन नव्हे तर तुम्हीच जबाबदार असल्याची तोफ खा. चिखलीकरांच्या आरोपाला उत्तर देताना लोहा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी डागली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध व सर्वात मोठी यात्रा म्हणून अनेक दशकांपासून ओळखली जाते. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशासह देशभराततून उंट, घोडे, गाढव, खेचर, कुत्री, गाय, म्हैस, बैल घेऊन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येतात. पशु, प्राण्यांची यात्रेतून विक्री होऊन, लाखो रुपयांची उलाढाल होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी, समाजकल्याण आदी विभागाच्या वतीने स्पर्धा, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. या यात्रेच्या नियोजनाची तयारी जि. प. पदाधिकारी, अधिकारी, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून होते. आतापर्यंत या यात्रेचे नियोजन उत्कृष्ट राहिले आहे.
मात्र, यावर्षी जिल्हा परिषदेवर प्रशासक राज तसेच राज्यातील सत्तांतराचा परिणाम नियोजनावर झाला. सत्ताधारी असलेल्या खा. चिखलीकर जसे काही आता आपणच सर्वस्व या भूमिकेत वावरू लागले आहेत. स्वतः जि. प. अधिकारी व प्रशासनाच्या बैठका त्यांनी घेतल्या. तर खा. सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांच्या उपस्थितीतही बैठक घेण्यात आली. स्थानिक आ. श्यामसुंदर शिंदे यांनीही दोन बैठका घेत आपणही मागे नाहीत असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
प्रत्येक लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे सल्ले आल्यामुळे नियोजनात प्रशासनाची मोठी कोंडी झाली. तरीही मागच्या अनुभवातून उत्कृष्ट नियोजनाचा प्रयत्न प्रशासनाने केला. परंतु, सत्ताधाऱ्यांचे वाढता हस्तक्षेप प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी ठरली. तसेच यात्रेसाठीचा शासनाचा ७ कोटी ७७ लाखांचा बहुतांश निधी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे वास्तू उभारणीपेक्षा सपाटीकरणासाठी खर्च झाल्याने यात काय गौडबंगाल आहे का? असा प्रश्न उपस्थित करत नियोजनातील त्रुटी यामुळे पशुमालक व यात्रेकरूंच्या गैरसोयीस खा. चिखलीकरासह सत्ताधारी लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.