नांदेड| शिख समाजाला इतिहास आहे. या समाजातील श्री. गुरुगोबिंदसिंगजीने इतिहास घडविला आहे. श्री. गुरुगोबिंदसिंगजीने स्वतःच्या चार मुलांचे बलिदान दिलेले आहे. या समाजाने अनेक वीरांचे बलिदान दिलेले आहे. देशाच्या रक्षणासाठी या समाजाचे मोठे योगदान आहे.शिख समाजाला बलिदानाची परंपरा आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केले.
ते दि.२६ डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘विर बालक दिवस’ विशेष व्याख्यानकार्यक्रमामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्रजी खन्ना, अॅड अमरिकसिंह वासरीकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी मुंबई येथील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत राजेंद्रजी खन्ना यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले श्री.गुरुगोबिंदसिंगजी यांच्या चार बालकांचे बलिदान हे आजच्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे.श्री. गुरुगोबिंदसिंगजीने सर्व धर्म, जातीतील माणसांना सोबत घेऊन सैन्य उभे केले होते. जुलूम आणि अत्याचार विरोधात सर्वांना सोबत घेऊन लढले. त्या काळातही त्यांनी एक लक्ष सैन्यांची फौज उभी केली होती. त्यांचे पुत्र बाबा अजितसिंगजी, बाबा झुंजारसिंगजी, बाबा जोरावरसिंगजी आणि बाबा फत्तेहसिंगजी या चार साहीब जाद्यांचे बलिदान त्यांना जुलूम वअत्याचार विरोधात द्यावे लागले. तरीही ते न डगमगता पुढे लढले.