हिमायतनगर| आदिलाबाद – अकोला व्हाया परळी आदिलाबाद या पॅसेंजर रेल्वेगाडीला प्रवाश्यांची मोठी गर्दी होत असून, डब्ब्यात जागाच शिल्लक राहत नसल्याने प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या शहरातील लोकल गाडी आदिलाबाद, अकोला,परळी या दरम्यान चालवीली जात असल्याने पुन्हा एकदा प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत. लोकल रेल्वेगाडीत स्वच्छतागृह नसल्याने प्रवाश्यांची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच या रेल्वेगाडीत मोबाईल चार्चींगची ही व्यवस्था नाही. त्यामुळे पूर्वीचीच रेल्वे गाडी या मार्गावर चालवून त्याच रेल्वेगाडीला अधिकचे डब्बे जोडून प्रवाश्यांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
भारतीय रेल्वे ही गरीब रथ म्हणून संबोधले जाते. रेल्वेचा प्रवास सुखाचा व तसेच सुरक्षित असल्याने प्रवाशी रेल्वेला प्राधान्य देतात. विशेषकरून रेल्वेचा तिकीट दर गरिबांना परवडणारा असल्याने प्रवाशी संख्या भरमसाठ वाढली आहे. या प्रवाशी गाडीला प्रवाश्यांची तोबा गर्दी होत असल्याने जागा अपूरी पडत आहे. त्यामुळे जवळपास दोन अडीच तासाचा प्रवास उभ्याने करणे प्रवाश्यांना जोखमीचे ठरत आहे. विशेषत्वाने या मार्गावर लोकल गाडी ही गेल्या काही दिवसांपासून चालवीली जात आहे.
या लोकल गाडीत प्रवाश्याना लांबचा प्रवास करणे अतिशय अवघड जात असून प्रवाशी वर्गातून या बाबत नाराजीचा सुर उमटत आहे. असुविधेचा दुसरा विषय असा की, या लोकल ट्रेन मध्ये सौचालयाचा अभाव आहे. सौचालय नसल्याने प्रवाश्यांची, विशेषकरून महिला प्रवाश्यांची मोठी कुचंबणा होत आहे. या बाबींकडे रेल्वे विभागांच्या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष पुरवून या ठिकाणी नव्याने चालत असलेली लोकल रेल्वेगाडी बंद करून पूर्वीच्याच रेल्वेला किमान चार डब्बे अधिकचे जोडून प्रवाश्यांची गैरसोय थांबवावी. अशी मागणी रेल्वे प्रवाश्यातून पुढे आली आहे.