नांदेड। दि.२७ डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचे आवाहन सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनने केले होते.
परंतु प्रवास व इतर अडचणी मुळे नांदेड कमिटीने नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय या पूर्वीच घेतला होता.त्याअनुषगाने दि.२७ डिसेंबर रोजी कलामंदिर येथून दुपारी एक वाजता भव्य मोर्चा सीटू च्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉ.विजय गाभणे आणि जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.मोर्चामध्ये एकूण सतरा मागण्या करण्यात आल्या असून त्यापैकी प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे गटप्रवर्तकांचे काम असून गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. अशांना २६ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २८ हजार रुपये मानधन देण्यात यावे. आशा व गटप्रवर्तकांसाठी प्रसूती रजा सहा महिने करून दरम्यानच्या काळात लागू असलेले संपूर्ण मानधन देण्यात यावे. आशा व गटप्रवर्तकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या. आशा व गटप्रवर्तकांना स्टेशनरी खर्च देण्यात यावा नवीन आशांच्या ट्रेनिंग घेऊन त्यांना मोबदला मागील फरकासह देण्यात यावा.
आदी मागण्यासह इतरही मागण्याचे निवेदन सिटूच्या वतीने देण्यात आले. ते म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६७ नुसार मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर येथे गावठाण विस्तारवाढ योजनेची अंमलबजावणी करून मागील पन्नास वर्षांपासून नवीन प्लॉट पाडले नाहीत तेथे तात्काळ नवीन प्लॉट पाढून अर्जदारांना प्लॉट देऊन घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान स्वरूपात देण्यात यावेत आणि स्थलानंतर थांबवावे. ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर कॉ.विजय गाभणे, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.शिलाताई ठाकूर, कॉ.वर्षा सांगडे, कॉ.सारजा कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलनास अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या निमंत्रक कॉ. करवंदा गायकवाड, तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड, डीवायएफआयचे कॉ.जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे,माजी सैनिक ओ.एस. ठोके, गांधी आंबेडकर मजूर संघटनेचे अध्यक्ष ऍड.विष्णू गोडबोले आदींनी पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. स्थानिक आणि यापूर्वी सिटूच्या वतीने केलेल्या मागण्या सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अन्यथा थेट त्यांच्या दालनात घेराव घालण्यात येईल असा इशारा यावेळी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिला आहे.