मुंबई| “स्वातंत्र्य संग्राम ते स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्षशील आणि ठाम भूमिका मांडणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘मन्याडचा वाघ’ म्हणून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा दरारा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आणिबाणी विरुद्धचा लढा यात ते हिरिरीने सहभागी झाले. विधानसभेत कंधार भागाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केशवराव धोंडगे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि अगदी गुराखी यांच्यासारख्यांच्या प्रश्नावर शेवटपर्यंत आपली आग्रही भूमिका मांडली. रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळातील त्याची समर्पक मांडणी यामुळे त्यांची भाषणं आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निधनामुळे राजकारण, समाजकारणातील प्रेरणादायी, मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. अनेक सामाजिक चळवळींचा आधारवड नाहीसा झाला आहे असे सांगून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत त्यांची भाषण त्या काळात प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला.
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले : मंत्री सुधीर मुनगंटीवार
केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, केशवरावांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे. आपल्या विचारसरणीशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर ते आक्रमक राहिले. त्यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आप्तांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो आणि केशवरावांना सद्गती देवो अशी प्रार्थना त्यांनी करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.