नांदेड/हदगाव। तालुक्यात मोठ्या दोन नद्या वाहतात त्यापैकी पैनगंगा व कयाधू या नदीतून हजारो ब्रास रेती रोज उत्खनन केली जाते व ती पाच ते सात हजार रुपये ब्रास या दराने राजरोसपणे विकली जाते.
हदगाव तालुक्यात पैनगंगा कयाधू व लाखाडी या तीन नद्या वरील 62 रेती गट आहेत या रिती गटातून दररोज हजारो ब्रास रेती अवैधरित्या उत्खनन करून चोरट्या मार्गाने विकली जाते तालुक्यातील रेती तस्करी ही महसूल प्रशासनाचा संगनमताने चालते याचे धडधडीत अनेक उदाहरण दिसून येत आहेत हदगाव शहरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिवसाढवळ्या आणि सकाळ संध्याकाळ सुद्धा शेकडो अनेक रेतीचे ट्रॅक्टर व टिप्पर भरधाव पळताना दिसून येतील रेती तस्करीतून महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून येथील रेती तस्कर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमताने गिळत आहेत.
बाभळी, बेलमंडळ, गुरफळी, गोर्लेगाव, बनचिंचोली, वाटेगाव, धोतरा, हरडफ, चेंडकापूर, मार्लेगाव, पिंपरखेड, रुई, धानोरा, हस्तरा, उंचाडा, करमोडी, बेलगव्हाण, भानेगाव, साप्ती, ऊंचेगांव, ईरापूर, मनुला, अशा अनेक गावांच्या नदी पत्रातून हजारो ब्रास रेती दोनशे ते तीनशे ट्रॅक्टरच्या सहाय्याने राजरोसपणे सायंकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत ट्रॅक्टर भरून आणले जाते व ते सुद्धा तहसील अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयांच्या समोरून उजागर वाहतूक करतात.
याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही किंवा जाणून-बुजून लक्ष दिले जात नाही हा चर्चे चा विषय बनला आहे. या रेती वाहतुकीत अनेक राजकीय नेत्यांचे चेले चपाटे व काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आमचे काहीच कोणी वाकडे करू शकत नाही असे रेती तस्कर बोलून दाखवतात. एवढे आरोप व तक्रारी होत असतांना देखील अधिकारी गप्प का बसले असावेत हा संशोधनाचा विषय आहे.
कोणी तक्रार केलीच तर कारवाई करण्याचे नाटक केले जाते. तहसीलचे कर्मचारी ज्या वेळी रेतीच्या पेंडावर कारवाई करण्यासाठी येतात त्या वेळी पूर्ण माहिती त्या रेती तस्करांना आधीच मिळते. त्या दिवशी कोणतेही ट्रॅक्टर रेती पेंडावर येत नाही. जरी आले तरी त्यांचा मार्ग बदलून आणले जाते. ती भेट औपचारिक असते. त्यामुळे तहसीलचे अधिकारी रेतीतस्करी व वाहतुकीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करतील का ? व शासनाचा करोडो रुपयांचा बुडणारा महसूल वाचवतील का? असे तालुक्यातील नागरिकात बोलले जात आहे.