नांदेड। तृतीयपंथीयांमध्ये दोन गट पडल्यामुळे भिक्षा मागण्याच्या कारणावरून दोन्ही गटामध्ये खटके उडत आहेत. लाल बावटा मध्ये असलेल्या तृतीय पंथीयांना मदत आणि भिक्षा मागण्यावर इतर गटाचे किन्नर बळजबरीने रोख लावत असून काही पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जात असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना संघटनेच्या लेटरपॅड दिनांक १३ जानेवारी रोजी देण्यात आली आहे. निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे विमानतळ यांना देखील माहितीस्तव देण्यात आली आहे.
सन २०२१ मध्ये माकप सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांच्या जिवमरणाच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा आयुक्त आणि सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर अनेक आंदोलने करून बऱ्याच मागण्या सोडविण्यासाठी प्रशासनास भाग पाडले आहे.
ट्रान्सजेन्डर महाविकास जनआंदोलन (लाल बावटा) ने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करून तृतीयपंथीयांना चांगले दिवस आणले होते परंतु अंतर्गत गटबाजीमुळे लाल बावटा संघटनेसी संलग्न असलेल्या तृतीयपंथीयांना भिक्षा मागण्यास इतर गटाचे लोक बेकायदेशीर रित्या रोख लावत आहेत.तसेच गुरु गौरी आणि पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.
सदस्य सचिव तृतीयपंथी जिल्हा तक्रार निवारण समिती नांदेड यांनी तातडीने बैठक लावून तोडगा काढावा आणि मागील निवेदनातील मागण्या सोडवाव्यात या साठी दि.१६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता माकप प्रणित तृतीयपंथी जनआंदोलनाच्या वतीने न्याय भवन नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई करावी आणि सर्व तृतीयपंथीयांना आधार कार्ड आणि इतर कागजपत्रे देण्यात यावीत अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.गौरी अहेमद नायक किन्नर,कॉ.मगदूम पाशा,कॉ.मारोती केंद्रे, कॉ.दतोपंत इंगळे आदींच्या स्वक्षऱ्या आहेत.