
नांदेड| नागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा) यांचा समावेश करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले. “मकर संक्रांती-भोगी” पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस जिल्हयामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आत्मा सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये तृणधान्याचा आरोग्यातील महत्त्व या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्याचे लागवड तंत्रज्ञान याबद्दल माहिती देऊन तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा व राजगिरा या तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ-उपपदार्थ आहारासाठी पौष्टीक असल्याने त्याचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या कार्यक्रमास कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे राठोड, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांची उपस्थिती होती.


यावेळी लोहा तालुक्यातील सायाळ येथील रत्नाकर गंगाधर ढगे (राजगिरा उत्पादक शेतकरी) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. आर. प्रकल्प आत्माचे उपसंचालक श्रीमती सोनवणे यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे महिला बचतगट प्रतिनिधी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. शेवटी तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी आभार मानले.
