
नांदेड| महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. देशात मुबलक पाणी असताना स्वातंत्र्यानंतर पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळत नाही. स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’ बनवणार होते पण ‘जोक इन इंडिया’ झाला. कुठे गेला ‘मेक इन इंडिया’ देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत या विदारक परिस्थितीला काॅंग्रेस – भाजप जबाबदार आहे. ही परीस्थिती पाहता देशपातळीवर काम करण्याचा निर्णय “बीआरएस’ने घेतला. बीआरएसला देशभरात समर्थन मिळत असून “अब की बार किसान सरकार’ असा नारा बीआरएसचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिला.

ते दि.०५ रोजी नांदेड येथील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना जन्म देणाऱ्या भूमीला नमन करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. त्यातील ५४ वर्षे काँग्रेसचे, तर १६ वर्षे भाजपचे राज्य होते. देशातील आजच्या स्थितीला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. फक्त “मन की बात’ करून किंवा “मेक इन इंडिया’ अशा घोषणा देऊन जनतेला फायदा होत नाही. मेक इन इंडिया म्हणताना देशातील सर्व गल्लीबोळात चायना बाजार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार असल्याचे ते म्हणाले. देशात गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध आहे. १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो. सरकारची इच्छा असेल तर देशातील शेतात पाणी पुरवठा होऊ शकतो. राज्यांमध्ये पाण्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. देशाला १०० वर्षे पाणी टंचाई नाही. प्रकल्प बनवा. पाणी टंचाई व पुरापासून वाचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये सत्तेल आल्यानंतर महिलांची प्रगती करण्यासह त्यांना लाेकसभा, विधानसभेत ३३ टक्के जागा वाढवून संधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

मनसेच्या अनेक कार्यकर्ते ताब्यात
दरम्यान नांदेड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केसीआर यांची सभा उधळून लावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना केसीआर यांच्या सभेकडे जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
श्रीराम सागर धरणाचे पाणी जालना, बीडसाठी सोडण्यास तयार, बाभळी’साठी एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा – केसीआर

तेलंगणातील श्रीराम सागर धरणातील पाणी जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगून नांदेड आणि तेलंगणाच्या सीमेवर धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. तेलंगणमधील पाणी घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळी भागात द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी नांदेड येथे बीआरएस पक्षाची रविवारी सभा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री केसीआर यांनी पत्रकार परिषद घेतली.

