
नांदेड| आदिवासी शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसामुंडा कृषिक्रांती योजना (क्षेत्राबाहेरील व क्षेत्रांतर्गत) कार्यरत आहेत. यात असंख्य शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन प्रगती साध्य केली आहे.

सन 2021-22 मधील महाडीबीटी पार्टलद्वारे जिल्ह्यातील एकुण 999 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. तथापि त्यांना पोर्टलवर अर्जातील त्रुटींची पूर्तता पोर्टलवर करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. या सुचना देऊनही अनेकांनी आपली पूर्तता केली नाही.

ही बाब विचारात घेऊन ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन त्रुटी भरण्यासाठी अडचण येत असेल त्यांच्यासाठी त्या-त्या भागातील कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याशी संपर्क साधून आपले त्रुटी येत्या 8 दिवसात पुर्तता करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

जे निवड झालेले लाभार्थी आपल्या त्रुटीची पूर्तता आठ दिवसात करणार नाहीत, असे निवड झालेले लाभार्थी इच्छूक नाहीत असे समजून त्यांची निवड रद्द केली जाईल व प्रतिक्षा यादीतील इतर शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, असेही जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

