
हिमायतनगर,अनिल मादसवार। हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील क्षेत्रातील दोन तालुक्याच्या विकासकामाचा अगोदरच्या लोकप्रतिनिधीपेक्षा कितीतरी पटीने विकासाचा निधी मंजुर करुन सदर कामे वेळेत पुर्ण करण्यात यश मिळाले आहे. हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील पाणी, आरोग्य विभागाच्या कामाचा चौफेर होत असलेला विकास जनता पाहत आहे. राज्यातील पोलिस निवासस्थानासाठी शासनाने ३०० कोटी रुपये मंजुर केले असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून हदगाव- हिमायतनगर तालुक्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये मंजुर झाले. या सर्वच कामांचे भुमीपुजन झाले असून, ठेजेदाराने दर्जेदार पद्धतीने व सुसज्ज असे निवासस्थान वेळेत पूर्ण करावे अश्या सूचना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बांधकाम विभागासह गुत्तेदारास केल्या आहेत.

ते हिमायतनगर शहरातील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या नियोजीत निवासस्थानाच्या बांधकामांचे भुमीपुजन दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की, यापुर्वी हिमायतनगर शहरातील वरदविनायक गणपती मंदिर, कालींका मंदिर, शादिखाना, बौध्द समाज मंदिरा बरोबरच अण्णाभाऊ साठे सभागृह अशी विविध कामे झाली आहेत. जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर परीसराच्या विकासासाठी सर्वच लोकप्रतिनिधीपेक्षा अधिक निधी मिळून दिला आहे. शहराच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठयाचे कामही अंतिम टप्यात आले आहे. विधानसभा मतदार संघातील दोन्हीही तालुक्यातील अनेक गावांना थेट ईसापुर धरणातुन फिल्टर पाण्यासाठी कोट्यावधी रुपये मंजुर असुन, ते कामही प्रगतीवर चालु असल्याचे जनता पाहत आहे.

सर्व मायबाप जनतेचं ऋण फेडण्यासाठी सार्वजनिक विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही. यापुर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात जेवढी कामे केली त्यापेक्षा किती तरी पट कामे माझ्या कार्यकाळात झाल्याचे सत्यता कोणलाही नाकारता येणार नाही. पैनगंगा नदीवरील सात उच्च पातळीच्या बंधाऱ्यांचे काम मंजुर करण्यास यश आले आहे. आपण केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काही जणाकडुन प्रयत्न होत आहेत. फुकटचे श्रेय घेण्यापेक्षा आपल्या अखत्यारीत येणारे हिमायतनगर, किनवट राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासुन कासवगतीने सुरु आहे. अशा कामांना गती देवून प्रवाशांची गैरसोय दुर करण्याकडे त्यांनी लक्ष द्यावे.

सामान्याच्या हितासाठी विकासाची कामे करतांना आपल्या मतदार संघाचे कणा असणारे पोलिस, महसुलचे अधिकारी, कर्मचारी सुरक्षीत रहावेत म्हणुन २३ कोटीचे निवासस्थाने मंजुर करुन घेतली आहेत. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही सहकार्य मिळाल्याचे आ. जवळगावकर म्हणाले. विनाकारण कामाचे श्रेय घेणाऱ्यांनी शासनाकडुन विकासाची योजना आणण्याची धमक दाखवावी असेही आ. जवळगावकर म्हणाले.

याप्रसंगी तहसीलदार डी. एन. गायकवाड, अभियंता एम. एन. डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. एन. तुंगेनवार, सेवानिवृत्त पो. नि. भगवान कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, शासकिय गुतेदार सुरेशअण्णा पळशीकर, माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफिकभाई, प्रथम नगराध्यक्ष अखीलभाई, माजी जि. प. सदस्य हाजी समदखान, शहराध्यक्ष संजय माने, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, जनार्दन ताडेवाड, फेरोजखान पठाण, कानबा पोपलवार, ज्ञानेश्वर शिंदे, शेख रहिम सेठ, सुभाष शिंदे, अनंतराव देवकते, श्रीमती पंचफुलाबाई लोणे, लक्ष्मीबाई भवरे, अ. बाकी, योगेश चिलकावार, पंडीत ढोणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

