नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातून होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरातील परमेश्वर मंदिर कमान पासून ते रेल्वे गेट पर्यंत अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर सदरील रस्ता हा पूर्णपणे खोदकाम न करता डांबरीकरणाचे काम जैसे थे ठेऊन रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर डस्ट व गिट्टी मिक्स टाकून लेव्हल करण्यात आले, परंतु आजघडीला जडवाहाने जाऊन सदरील रस्त्यावरील डस्ट गिट्टी उघडी पडली असून, यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या डस्टच्या धुळीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यासह नागरिकांना धुळीमूळ आरोग्याचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता तात्काळ रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करा अन्यथा हिमायतनगर शहरातील रस्ता कामात भाईगिरी करणाऱ्या भाईजीला शहरात पाय ठेवण्यास मज्जाव करून अन्य गुत्तेदारामार्फत काम पूर्ण करून घेण्यासाठी गावकऱ्यांनी आता जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिमायतनगर शहरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर रेल्वे गेट पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ चे काम मागील तीन वर्षापासुन रखडत सुरु आहे. सदरचे काम सुनिल हायटेक कंपनीच्या नांवे देवुन पुढे कृष्णानंद इन्फ्रा या कंपनीस दिलेले आहे. तीन वर्षाच्या काळात सदर कंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम केले तर नाहीच त्या शिवाय रस्त्याची उंची, रुंदी कमी केली आहे. त्याच बरोबर संबंधित रस्ता कडक मुरुमापर्यंत खोदकाम न करता वरच्यावर जुन्या डांबरी रस्त्यावर मटेरियल टाकुन दबाई करुन थातुर – मातुर काम करण्यांचा सपाटा संबंधित गुत्तेदारांनी चालविला असुन, त्यास संबंधित विभागाचे अभियंत्यांची मुक संमती दिसत आहे. ज्याचा योग्य तंज्ञाकडुन मुल्याकन होणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाच्या जोडरस्ते प्रकल्पास बगल देवुन, भारतीय दळण वळणाची प्रक्रिया वाढवुन सक्षम भारत करण्यांच्या दृष्टीकोणतुन हिमायतनगर रेल्वे गेटवर उड्डाणपुल प्रस्तावीत आहे तो होणार यात तीळमात्र शंका नाही. राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या कमानी पासुन जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुल प्रस्तावीत होता, परंतु येथील काही भुमाफीयांनी हेतुपुरस्परणणे स्वत:च्या जमिनीचे मुल्य कमी होवू नये म्हणुन उड्डाणपुल रद्द करण्यांचा घाट काही राजकीय प्रस्थापित लोकांना धरून घातला आहे.
हिमायतनगर शहरात अर्धवट सोडून देण्यात आलेल्या रस्त्यावर खोदकाम करुन हार्ड मुरुम टाकुन ठेवल्यामुळे व सिमेंट कॉक्रेटचे काम न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरुन या रस्त्यावर किरकोळ अपघात रोजच घडत आहेत. तसेच या रस्त्यावरुन जड वाहन व दुचाकी स्वारांना जिवघेना प्रवास करावा लागत आहे. या सर्व बाबीकडे संबंधीत गुत्तेदाराच्या लक्षात आणुन दिले. तरी गुत्तेदार अरेरावीच्या भाषेत माझे कोणीही कांही वाकडे करु शकत नाही असे म्हणतात, मी माझ्या मर्जीने रस्त्याचे काम मला जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा करेल. अशी ताठर भुमीका घेत स्थानीकासह ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्यांचा प्रयत्न करीत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही बाब लक्षात घेता वरील रस्त्याचे काम सुरु करेपर्यंत धरणे आंदोलन करुन रास्ता रोको आंदोलन छेडण्यांत येणार असल्याने संबंधीत विभागाने याची नोंद घ्यावी असेही त्यात म्हंटले आहे. यावर शेकडो शहर व ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, वाहनधारक व जनतेच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हिमायतनगर शहर हे धुळीच शहर म्हणून संबोधित केले जाते आहे, त्यामुळे ज्यांना धुळीची एलर्जी आहे त्यांचं जीवनमान धोक्यात आले आहे. धुळीमुळे शिंका येणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, भरलेले नाक, डोळे सुजणे, डोळे-नाक आणि घशात खाज येणे, खोकला, डोकेदुखी, थकवा, नसांची समस्या आणि अशक्तपणा यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी वेळेत काम न पूर्ण केल्यास ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या पवित्र्यात शहरवासीयासह ग्रामीण भागातील नागरिक असल्याची चर्चा होत आहे. संबंधित ठेकेदार तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासह आता जीवाशी देखील खेळत असल्याचे बोलले जाते आहे. एकुणच रखडलेल्या या रस्त्यामुळे तालुक्यातील नागरिक व सर्वसामान्य जनता आक्रमक झाली आहे.