
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे हातणी ता.लोहा येथील एका तरूण अल्पभूधारक शेतकऱ्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपल्याची घटना बुधवारी (दि. २२) रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घडली. दरम्यान या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


उस्माननगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हातणी ( ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश दादाराव कदम (वय २८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुण शेतकऱ्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कर्जबाजारीपणा व सततची नापिकीमुळे आता कर्ज कशाने फेडायचे या विवंचनेतून आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.


मयत गणेश कदम यांचे एक वर्षांपूर्वीच लग्न झाले असून, त्यांच्या नावे तीन एकर कोरडवाहू शेती असून, त्याना बँकचे पीक कर्ज होते. त्यातच ते थकबाकीदार झाले व शेतातील सततची नापिकी उत्पन्नाची हमी नाही. त्यातच सध्या होत असलेला अवकाळी पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले, आता जीवन कसे जगायचे? याच विवेंचनेने या तरुण शेतकऱ्याने गळ्याला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवलीआहे.


उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच तात्काळ उस्माननगर पोलीस ठाण्याचे फौजदार प्रभू केंद्रे, जमादार राम कानगुले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शंकरराव चव्हाण( विष्णुपूरी )नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. मयत गणेश कदम यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. आत्महत्या करून या तरूण शेतकऱ्यांने जीवन यात्रा संपविल्याने कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास उस्माननगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष स.पो.नि.पी.डी. भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभू केंद्रे व बिट जमादार राम कानगुले हे तपास करीत आहेत.
