
नांदेड। सध्या शाळेत मुलांना शिकवतांना उपक्रम आणि प्रयोगशिलता यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. तथापि शिक्षकाला स्वतःच्या मानसिक स्थितीचे योग्य व्यवस्थापन करता आले आणि त्याने आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीच्या प्रती समर्पित सेवाभाव ठेवला तरच गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे त्याचे ध्येय पूर्णत्वास जावू शकते असे प्रतिपादन, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या अखिल भारतीय मंत्री डॉ. मधुश्री सावजी यांनी केले. त्या नांदेड येथील किलबिल बाल संस्कार केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षकांचे व्यक्तिमत्व या विषयावर सोमवार 27 मार्च रोजी व्याख्यान देतांना बोलत होत्या.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थापनी विद्याभारती देवगिरी प्रांताचे मंत्री प्रकाश भिवसनजी पोतदार हे होते. डॉ. सावजी पुढे म्हणाल्या की, शिक्षकांना घरची जबाबदारी सांभाळून विद्यादान करायचे असते. यात विशेषतः शिक्षिकांवर घरातल्या अनेक कामांची जबाबदारी असते. घरातली कामं घाईघाईने आवरुन शाळेत आलेली महिला शिक्षिका जर घरातल्या अनेक गोष्टींचे, मानसिक तणावाचे, शारिरीक दुखण्यांचे ओझे शाळेत घेऊन आली तर तिला मुलांना शिकवतांना आपल्याकडची विद्या पूर्णांशाने देणे शक्य होत नाही. अशा वेळी मानसिक व्यवस्थापनाची मोठी भूमिका असते असे डॉ. सावजी म्हणाल्या.


घरातली पुजासुध्दा निवांतपणे न करु शकलेल्या शिक्षकांनी शाळेतल्या प्रार्थनेच्या वेळी आपल्या मनाला शांतता शोधावी म्हणजे वर्गात जातांना ताजेतवानेपणाने जाता येईल. काही शाळांमध्ये एका एका वर्गात भरमसाठ विद्यार्थीसंख्या झालेली आहे. वर्गात मुलं गडबड, बंडपणा करतात. अशावेळी त्यांना शांत करणं आणि आपणही शांत रहाणं ही कसरत असते. परंतु शिक्षक आपल्या निर्धाराने लिलया हे करु शकतात.


विद्यार्थ्यांसोबत समरस होऊन शिक्षकांना अनेक गोष्टी करता येणं शक्य असतं. परंतु तशी दृष्टी आणि दृष्टीकोन शिक्षकांनी आत्मसात केला पाहिजे. अध्यापन हे थकवा आणणारे नव्हे तर उर्जा देणारे करणे शक्य आहे. पण आपण त्याला कसे पाहतो यावर ते अवलंबून असते असे डॉ. मधुश्री सावजी म्हणाल्या.
आपल्या कर्तव्याप्रतीची उत्सुकता आणि जिज्ञासा व्यक्तीच्या स्नायूंना बळकट करते. मनाची शक्ती प्रचंड असते. आपल्या नकारात्मक मानसिकतेमुळे शक्तीहीन वाटू लागते. मनाची शक्ती तुम्हाला मोठं करते.

एकदा एक व्यवसाय स्वीकारला की त्यात असेपर्यंत समर्पित भावनेने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. त्याच्याप्रती मनात नाराजी ठेवून राहू नये. तरच हाती घेतलेल्या कामात यश मिळतं. शिक्षकांचे यश म्हणजे गुणवंत विद्यार्थी घडवणं. शिक्षकांच्या समर्पित विद्यादानातूनच हे शक्य आहे. शिक्षकांचं व्यक्तीमत्व आंतरिक आणि बाह्य बाबींवर अवलंबून असलं तरी आंतरिक बाबींचा त्यात जास्त वाटा असतो. त्यामुळे शिक्षकांनी प्रेमळ, शिस्तप्रिय, व्यासंगी आणि तत्पर असलं पाहिजे असंही डॉ. मधुश्री सावजी म्हणाल्या.

अध्यक्षीय समारोपात देवगिरी प्रांत मंत्री प्रकाश पोतदार यांनी उपस्थित शिक्षकांना एनईपीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच नवीन शिक्षण धोरणाबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी 3 मे ते 13 मे दरम्यान मास्टर ट्रेनर वर्ग जळगाव जिल्ह्यात अंमळनेर येथे आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्गात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष अशोक टिकोरे, शिशुवाटिका प्रांतमंत्री वनमाला कुलकर्णी, दिपिका तुंगेनवार, रमेश मस्के, संतोष कुलकर्णी, नागेश उदगिरे आदिंची उपस्थिती होती. आदित्य तुंगेनवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अनेक शाळांचे शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.