
पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे,त्यांच्याच काव्यातून ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शनीवार ,८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.


प्रतिभावान लेखक,कवी,राष्ट्रभक्त, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनदर्शन या कार्यक्रमातून उलगडले.हा सांगीतिक कार्यक्रम ‘जन्मदा ‘ संस्था यांनी प्रस्तुत केला.’ गणिकेचा छंद नसे चांगला ‘, ‘तनूवेल ‘ या कविता, ‘जय जय शिवराया ‘ ही आरती, ‘ वीर बाजीप्रभू ‘ हा पोवाडा, ‘जयोस्तुते ‘ हे स्वतंत्रता गीत , ‘ सागरा प्राण तळमळला ‘, ‘ माझे मृत्यूपत्र ‘ , ‘ ये मृत्यो ये ,’ मला देवाचे दर्शन घेऊ द्या ‘, ‘ आत्मबळ ‘ अशा अनेक रचना सादर करण्यात आल्या. या रचनांनी सावरकरांचे चरित्रच उपस्थितांसमोर सादर केले. ‘ वंदे मातरम् ‘ ने कार्यक्रमाची सांगता झाली.


संहिता मिलिंद प्रभाकर सबनीस यांची होती. संगीत अजय पराड यांचे होते. अश्विनी पटवर्धन ,कृपा नाईक ,हिमानी नांदे ,देवव्रत भातखंडे ,ओंकार कपलाने,होनराज मावळे ,बिल्वा द्रविड यांनी गायन केले. चिन्मय वाईकर, ओंकार जोशी यांनी साथसंगत केली. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५९ वा कार्यक्रम होता .

