सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी टीव्ही चँनलच्या कँमेऱ्यासमोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जो थुंकण्याचा प्रयत्न केला तो कोणत्याही सभ्य माणसाला रुचणारा नाही. ज्या महाराष्ट्राची थोर परंपरा संजय राऊत दिवसभर लोकांना सांगत फिरतात त्या परंपरेत तो कोठेही बसणारा नाही. उलट त्या परंपरेला काळिमा फासणारा आहे.
संजय राऊत महाराष्ट्रातील एक नामवंत पत्रकार आहेत. त्यांच्या लिखाणातून प्रेरणा घ्यावी असे त्यांचे लेखन निर्भिड असते. त्यांच्या रोखठोक सदराचे अनेक वाचक आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न घाबरता ते बिनधास्त लिखाण करतात त्याला तोड नाही. लेखणी ही तलवारीसारखी चालली पाहिजेत असे जे म्हणतात ते त्यांच्या लिखाणाला चोख लागू पडते. परंतु कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असतात. आपल्याकडे घटनेने लेखन, मुद्रण, भाषण स्वातंत्र दिले आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा घातलेल्या आहेत.
अमेरिकेसारखे स्वेर स्वातंत्र आपल्या घटनेने कोणालाही दिलेले नाही. त्यामुळे पत्रकारासोबतच खासदार असलेल्या संजय राऊतांना याची जाणीव नसेल असे नाही. त्यामुळे राजकीय नेता म्हणून बोलताना त्यांनी संयम राखण्याची नितांत गरज आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० समर्थकांनी बंड करुन उद्वव ठाकरे यांचे मुख्यंमंत्री घालविले यामुळे एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा त्यांच्यावर राग आहे. तो राग रास्त आहे. परंतु त्यामुळे रोज उठून त्यांना शिव्यांची लाखोली वाहत बसणे हे कोणत्या सभ्यतेत बसते. राजकारणात शह-काटशहाचे खेळ नियमित सुरु असतात. देशावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसमध्ये हे खेळ सुरुवातीपासून आजवर चालत अले आहेत. परंतु कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी कधी सभ्यता सोडली नाही. कोणीही कोणाला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली नाही की कोणी कोणावर थुंकला नाही.
संजय राऊत केवळ राजकीय नेता म्हणून राजकीय भूमिका मांडत नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचे दाखले देत ते प्रबोधनही करीत असतात. जेव्हा तुम्ही राजकीय नेता म्हणून काही बोलता तेव्हा तुम्हाला कोणतीही बंधने नसतात. परंतु जेव्हा तुम्ही प्रबोधनकाराच्या भूमिकेत असता तेव्हा मात्र तुमचे चरित्र आणि चारित्र्य शुद्ध असलेच पाहिजेत. तुमच्या आचार विचारात कोणतीही तफावत असता कामा नये. तुम्ही नितीन गडकरींना भेटता, देवेंद्र फडणवीसांना भेटता तेव्हा हे सांगता की, आम्ही राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही. महाराष्ट्राची थोर परंपरा आहे. विरोधी पक्षातील, विरोधी विचारांच्या नेत्यांचे परस्परांशी स्नेहाचे, सलोख्याचे संबंध राहिले आहेत. हा आमचा इतिहास आहे. मग श्रीकांत शिंदेचे नाव घेताना तुम्ही जेव्हा थुंकता तेव्हा तुम्हाला या परंपरेची, या थोर इतिहासाचे स्मरण राहत नाही. तुम्ही हेही विसरुन जाता की, श्रीकांत शिंदे केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजिव नाही तर लोकसभेचे सदस्य आहेत. खासदार आहेत. खासदार म्हणून तुम्हाला जेवढी किंमत, मान मरातब आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त त्यांना आहे.
महाराष्ट्राचे रोज प्रबोधन करणाऱ्या संजय राऊतासारख्या एका विद्ववान खासदाराला याचे भान असू नये? गांडू, षंढ, आंडू – पांडू अशासारखे शब्द रोज कँमेऱ्यासमोर येऊन बोलणाऱ्या राऊतांना टीव्ही घरा घरात लहान मुलापासून महिलापर्यत सर्वजण पाहतात याचेही भान असू नये? एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केले त्याचे समर्थन नाहीच. त्यांना शिवसेने एवढ्या उंचीपर्यत पोहोचविल्या नंतरही त्यांनी पक्षात बंडाचा झेंडा उभा करावा हे योग्य नाही. परंतु राजकारणात सर्वच क्षम्य असते अशी जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा अशा कारवायाही नजरेआड केल्या जातात हे वास्तव आहे. परंतु बंडखोरी केली म्हणून रोज त्यांना खोके खोके म्हणून चिडविणे कितपत योग्य आहे? जेव्हा स्वत: संजय राऊत पत्राचाळ प्रकरणात आरोपी आहेत.
त्यांच्यावरही आरोप झाले आहेत आणि त्यातून ते अद्याप निर्दोष सुटलेले नाहीत. ज्या आमदारांनी बंड करुन शिंदेला साथ दिली. त्यांच्यावर ईडीची कारवाई होणार होती म्हणून ते गेले असे हे सांगतात. मग ईडी दारापर्यत येईपर्यत जी कमाई त्यांनी केली ती शिवसेनेतच केली ना? मग तेव्हा तुम्ही शांत का होता? शिवसेनेत पैसे कमावले तर चालतात, इतरत्र जाऊन नाही असे तर नाही ना?
पत्रकारांना समाज यासाठी भितो की त्याच्या हातात लेखणी असते. तो जो काही त्याच्या माध्यमात लिहितो त्याचा प्रतिवाद करण्यासाठी समोरच्या जवळ कोणतेही माध्यम नसते. त्यामुळे उगाच चिखलात दगड मारुन आपल्या अंगावर शिंतोडे कशाला उडवून घ्या या विचाराने लोक पत्रकारापासून लांब राहतात. त्यांच्या फार नादी लागत नाहीत. दुर्जनम प्रथम वंदे या न्यायाने लोक त्यांना नमस्कार करतात. त्यांच्या बद्दल फार आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो असे नाही. संजय राऊत यांना शिवसेनेतील इतर लोक भितात ते त्यांच्या हाती सामना आहे म्हणून. दुर्देवाने संजय राऊत सामनाची ताकद आपली स्वत:ची समजतात. त्या ताकदीच्या जोरावर ते बेताल वक्तव्ये करीत सुटतात.
त्यामुळे महाराष्ट्रात वाईट पायंडा पडत आहे याचेही त्यांना भान नाही. संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने नितेश राणे यांची नियुक्ती केली आहे. तेही योग्य नाही. दे दोघे एकमेकाविषयी ज्या पद्धतीने बोलतात ती महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. याने महाराष्ट्राचा गौरव कधीच वाढणार नाही. उलट महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर दिवसेदिवस घसरत चाललाय. दुर्देवाने हे थांबविणे लोकशाही असूनही लोकांच्या हातात नाही. उद्वव ठाकेर व भाजप ते थांबविणार नाही.
सर्वात धक्कादायक म्हणजे जेव्हा या थुंकण्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा महाराष्ट्रात थुंकण्याला बंदी आहे का? असे साळसूदपणे त्यांनी विचारले. बंदीचा आदेश दाखवा म्हणाले. याला काय म्हणावे? संजय राऊतांच्या अशा वागण्याने शिवसेना वाढेल, जनाधार वाढेल असा जर कोणाला भ्रम असेल तो चुकीचा आहे. अशा बोलण्याने चार टाळ्या, चार हशा मिळतील परंतु मते मिळतीलच असे नाही. त्यांचे टीव्हीवरील अविर्भाव, शब्द, वक्तव्ये याने मते चार घटका करमणूक होईल शिवसेनेची मते वाढणार नाहीत. राजकारणात सत्ता येते जाते परंतु नेत्यांनी संयम ढळू देता कामा नये. संजय राऊत ज्यांना गुरु मानतात, रोज ज्यांचे गुणगाण गातात त्या शरद पवारांनीही पुलोदचा प्रयोग करुन एकनाथ शिंदेसारखाच काँग्रेसला धोका दिला. विदेशीच्या मुद्यावरुन पुन्हा दिला. परंतु काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांने शरद पवारावर राऊत करतात तशी टीका केली नाही. हे एक जरी उदाहरण राऊतांनी डोळ्यासमोर ठेवले तरी महाराष्ट्रातील राजकारणाची होणारी घसरण थांबेल.
लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. ३.६.२३, मो.नं. ७०२०३८५८११