नांदेड। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नांदेड शहरा जवळ असलेल्या बोंढार (हवेली ) या गावात पुर्व वैमनस्याने अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माणुसकीला लाजवेल अश्या प्रकाराने मानवी संवेदना बोथट झाल्यात की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गावात का साजरी केली हा राग मनात धरून वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असलेल्या अक्षय भालेराव याला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सामूहिक हल्ला करून जीवे मारले आहे.
या घटनेचा नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावे, त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. सदरील खटला हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा. मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, त्यांना तात्काळ शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. त्याचबरोबर या गावात असलेल्या बौद्ध समाजाला दीर्घकाळ संरक्षण देण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे नांदेड,दक्षिण तालुका अध्यक्ष विनायक गजभारे यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महासचिव शाम कांबळे, महानगराध्यक्ष (दक्षिण) विठ्ठल गायकवाड, महानगराध्यक्ष (उत्तर) आयुब खान पठाण ,जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सरोदे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, डॉक्टर भेदे, शेख बिलाला, धम्मा एंगडे, आदींची उपस्थिती होती.