मुंबई| महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा भूकंप झाल्याचा पाहावयास मिळालं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजभवनावर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काल रविवारी सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांना सोबत घेऊन अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवारांनीही आज सकाळी मुंबईत तातडीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे सकाळपासूनच अजित पवार सरकारमध्ये सामील होणार व त्यांचा शपथविधी होणार या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे 54 पैकी 30 आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.
जे घडले ते महाराष्ट्राच्य हिताचे- फडणवीस
शपथविधीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज जे घडले ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा नवीन अध्याय लिहू. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती देऊ. राज्याला अतिशय प्रगल्भ सरकार देऊ.
आमचे आता ट्रिपल इंजिन सरकार- शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे पूर्वी डबल इंजिनचे सरकार होते. ते आता ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. आमच्या डबल इंजिनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेचाच फायदा होणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार परत येणार ?
अजित पवार यांच्यासोबत जे आमदार सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यातील बहुतांश आमदार राष्ट्रवादीत परत येतील, अशी माहिती आता सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते हजर झाले आहेत. दरम्यान, आजचा शपथविधी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे. महेश तपासे म्हणाले की, भाजपच्या ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे. काही आमदार शरद पवारांसोबत गेले असले तरी कार्यकर्ते अजूनही शरद पवारांसोबत आहेत.
अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा नाही?
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, असे सांगितले आहे. मी खंबीर आहे. लोक आपल्या पाठीशी आहेत, असे शरद पवार यांनी संजय राऊतांना सांगितले आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले. काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा उचलल्याची टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या समर्थक आमदारांसह सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या गोटाला मिळाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनाक्रमानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली.
शरद पवारांची साथ सोडून हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत; मंत्रिपदाची घेतली शपथ
राज्यातील शिवसेना शिंदे गट- भाजपा यांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठोपाठ हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे. हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीची चौकशी सुरू असल्याने त्यातून सुटकेचा मार्ग म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.