नांदेड। शहरातील सखल भागात असलेल्या अनेक नगरामध्ये तीन ते चार फूट पाणी घरामध्ये जाऊन अनेक पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अद्याप कसल्याही प्रकारचा सर्वे केला नसून घरात पुराचे पाणी जाऊन नुकसान झालेल्या पीडिताना कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही. सिटू संलग्न मजदूर युनियन च्या वतीने संघटनेचे सभासद असलेल्या भागात पाहणी करून सभासदांचे वयक्तिक अर्ज आणि संघटनेच्या शिष्ठमंडळाने महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. कर्मवीर नगर, विठ्ठल नगर, बालाजी नगर, महेबून नगर, बजरंग कॉलनी, नवीन कौठा आदी भागातील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी गेट वर आंदोलकांना भेटून पाठिंबा दिला.
लाल बावटे घेऊन महापालिका कार्यालयात पूरग्रस्त घुसून सन 2006 च्या धरतीवर 20 हजार रुपये रोख आणि 50 किलो अन्न धान्य तातडीने वाटप करावे आशा घोषणा देत होते. सीटू कामगार संघटनेने केलेल्या दि.29 आणि 30 जुलै रोजीच्या सर्वे मध्ये खुपच भयावह परिस्थिती समोर आली आहे. शहरातील काही गोर – गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शहरातील सखल भागात पुराचे पाणी घरात गेल्यामुळे अन्न धान्य,कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू उदाहरणार्थ टीव्ही,फ्रिज,पंखे तसेच मोटारसायकल व इतर वाहने इत्यादी नादुरुस्त किंवा निकामी झाले आहेत. त्यामुळे रोजंदारी व मिळेल ते काम करणारा कामगार सर्वात जास्त या अतिवृष्टीचा बळी ठरला आहे. पावसात सापडलेल्या कुटुंबातील अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सन 2006 मध्ये अशीच अतिवृष्टी नांदेड शहरात झाली होती तेव्हा सिटू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आंदोलने करून तातडीने सानुग्रह अनुदान स्वरूपात रुपये 5000/ रोख आणि 20 किलो ग्रॅम ची धान्य किट मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
त्याच धरतीवर या अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना रोख 20,000/ रुपये आणि 50 किलो ग्रॅम ची रेशन किट देण्यात यावी यासाठी नांदेड मनपा आयुक्त यांना सिटू संलग्न मजदूर युनियन च्या वतीने दिनांक 31 जुलै 2023 रोजी सामूहिक अर्ज भरून विनंती करण्यात आली आहे. सामूहिक अर्जाचा विचार तातडीने करावा आणि सानुग्रह अनुदान वाटप करावे अन्यथा दि.3 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय पूरग्रस्तानी घेतला आहे.
सदरील आंदोलनाचे नेतृत्व सिटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड हे करीत असून कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड यांच्या सह सीटू चे स्थानिक कार्यकर्ते मोहिमेत सहभागी होऊन जनजागृती करीत आहेत. अर्ज भरण्याच्या मोहोमेत सीटू चे जेष्ठ नेते कॉ.विजय गाभने आणि जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी मार्गदर्शन केले.
मोहीम यशस्वी करण्यासाठी ऍड.भीमराव सोनाळे,वदंना खिराडे,चंद्रकांत उबाळे,सय्यद मैनोदिन, कॉ.जयराज गायकवाड,साई कोमार,बालाजी नरवाडे,प्रदीप सोनाळे,सुनील भाऊ अनंतवार,बाबू घोनसेटवाड, मंजुळाबाई पाईकराव, शिला नरवाडे, रेखा उबाळे, पुजा सोनकांबळे आदींनी प्रयत्न केले. पुढील दोन दिवसात योग्य व्यक्तींना सानुग्रह अनुदान वाटप झाले नाहीतर तीन ऑगस्ट पासून सामूहिक उपोषणास बसण्याचा इशारा सीटू ने दिला असून त्या निवेदणावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील आमदार मोहन आण्णा हंबर्डे आणि आमदार बालाजी कल्याणकर यांना दिल्या आहेत.